11/09/2020
10 सप्टेंबर हा आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून साजरा केला जातो . सध्या तरुण वर्गात आत्महत्या करण्याचे प्रमाण तुलनेने वाढलेला आहे . बालपणापासून त्यांना हवे ते तात्काळ मिळणे ,नकार पचवण्याची सवय नसणे... येथपासून तर अपयश ... मग ते अभ्यासातील असो की प्रेमात .....येथपर्यंत अनेक कारणे आहेत ! पण तरी मला माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांवरून एक गोष्ट समजली की, फॅमिली हिस्ट्री आणि मानसिक आधाराचा अभाव या व्यतिरिक्त बाकी सगळी कारण ही बहुतांशी वैयक्तिक असतात . उदाहरणार्थ दीर्घकालीन आजार ,नैराश्य, अपयश ,व्यवसायातील नुकसान इ. कौटुंबिक इतिहास असला तर ही प्रवृत्ती कशी काय निर्माण होते हे शास्त्राला अजूनही न उलगडलेले कोडे आहे . पण असे अनेक रुग्ण प्रत्यक्षात आढळतात . मानसिक आधार हा कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी , शिक्षक यांच्याकडून योग्य वेळी मिळायला हवा याबद्दल दुमत असू नये. पण समजा नाही मिळाला तर तो भरून काढणं आपण शिकायला हवं . काही मुलं एकल पालकत्व असलेल्या घरात वाढतात , काही मुलं पालकांचे होणारे वाद ऐकतच मोठे हो. पण कधी अशी मुलं फार लवकर समजूतदार होतात, लवकरच प्रगल्भ होऊन आपल्या आयुष्याची जबाबदारी घेतात. जीवन सोपं आणि सहज करण्याकडे त्यांचा कल असतो. अभ्यासात किंवा छंदात मन गुंतवतात ....माझ्या पाहण्यात नुकताच असा मुलगा आला.... तो लहानपणापासून आई-बाबांचे वाद बघतच वाढला . तो अक्षरशः दहावीत असताना ते विभक्त झाले . ...आणि आईने लगेच दुसरे लग्न केले . तरी हा मुलगा दहावीत उत्तम मार्कांनी पास झाला .मग त्याने डिप्लोमा इन कंप्यूटर इंजीनियरिंग ला प्रवेश घेतला . त्यात उत्तम मार्काने पास होऊन त्याला पुण्यात नोकरी मिळाली . ही नोकरी करत त्याने BE पूर्ण केलं आणि आता ME करीत आहे .या दरम्यान स्वतःच्या 1bhk फ्लॅट साठी पैसे गुंतवले. एक बाईक देखील खरेदी केली. कुठून मिळाला असेल त्याला मानसिक आधार ?कसे मिळवले त्याने जीवनाला सामोरे जाण्याचे धैर्य? आजची तरुण पिढी अत्यंत हुशार आहे . पण थांबणं, वाट पहाणे, मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी पचवणं हे त्यांना फार कठीण जातं. याचं खरं कारण म्हणजे ते आपल्या भावना सुद्धा यंत्रांना संलग्न करून टाकतात . माणूस आणि यंत्र यात भेद आहे . मानवी संबंध ,जीवन यात चढ-उतार असणारच . त्यांना व्यवस्थित तोंड देणं हेच यश ! हे त्यांना खरं तर समजावून सांगायला हवं . ज्ञान खूप परंतु अनुभवाची कमतरता यामुळे त्यांची गती आणि जीवनाची गती यात अंतर पडत चालले आहे .
समाजातील वावर वाढवणं , लोकांच्या प्रत्यक्ष सहवासात रमणे, नातेसंबंध जपणे आणि मित्रत्व जपताना तन-मन-धन समर्पित करणे हे त्यांना शिकवायला हवे. जीवनात कोणतीही शैक्षणिक परीक्षा महत्त्वाची नाही तर या परीक्षेला आणि त्यातून येणाऱ्या यश अपयशाला तोंड देण्याची "परीक्षा" अधिक महत्त्वाचे आहे ,हे त्यांना पटवायला हवं . परिस्थिती कुठलीही असो चांगली किंवा वाईट ....ती तात्पुरती असते. त्यामुळे कुठलाही बदल नीट स्वीकारणे आणि आयुष्याचा आनंद घेणे हेच ध्येय ठेवलं तर आयुष्य किती सुंदर, सोपं आणि सहज होऊन जाईल ! आत्मघात करण्याचा विचार देखील कोणाच्या मनात येणार नाही. आत्महत्या प्रतिबंध दिवस साजरा करण्याची गरज उरणार नाही.