25/03/2021
*विनम्र निवेदन*
दारू, सिगारेट, ड्रग्ज, तंबाखू यासारख्या व्यसनांमुळे अनेकांची आयुष्ये बरबाद होत आहेत. अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. वाढती गुन्हेगारी, बोकाळलेला भ्रष्टाचार, अत्याचार- विशेषतः महिलांवरील अत्याचार - हेही याचेच परिणाम आहेत.
जनतेच्या कल्याणासाठी व इतरही अनेक सामाजिक व आर्थिक कारणांसाठी आता पूर्ण महाराष्ट्र, नशामुक्त करण्याची वेळ आलेली आहे. यासाठी जनतेने व शासनाने ठोस पावले उचलून दूरदृष्टीने प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. दारू, ड्रग्ज, सिगारेट, गुटका यासारख्या गोष्टींना पूर्ण हद्दपार करण्याची वेळ आली आहे. याकरिता आम्ही येत्या २ वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने काय उपाययोजना करता येतील ते या निवेदनातून सुचवत आहोत.
एक छोट्या मुलीचे तिच्या व्यसनाधीन पित्याला उद्देशून लिहिलेले हे पत्र पहा---
प्रिय बाबा,
तुमच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या दारूच्या व्यसनामुळे आम्ही अगदी वैतागलो आहोत. तुमची प्रकृतीही ढासळत चालली आहे. कुठे गेले ते माझे पूर्वीचे सशक्त आणि ताकदवान बाबा? हल्ली तुम्ही प्रत्येकाशी भांडत असता. माझ्या मैत्रीणी सुद्धा त्यामुळे आता घरी येईनाशा झाल्या आहेत. पैशाची तर कायम ओढाताण आहेच. आई अत्यंत दुःखीकष्टी आहे. आजी आजोबा सुद्धा तुमची काळजी करून खूप थकले आहेत. तुम्ही आम्हाला आता पूर्वीसारखा वेळही देत नाही आहात. कृपया सर्वांचा घात करणारी ही सवय आता सोडा. आम्हाला आमचे पूर्वीचे निरोगी व आंनदी बाबा हवे आहेत.
तुमची (लाडकी?)
दीपा
ही अशी फक्त एक 'दीपा' नाहीये. महाराष्ट्रात अशा असंख्य हताश आणि निराश दीपा आहेत. त्यांचे भवितव्य अंधःकारमय आहे.
आपल्याकडे काही लोकांत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात दारू पिण्याची प्रथा आहे. त्यांच्या दृष्टीने ही खुशीची बाब असली तरी त्याची दुसरी पण �