05/10/2025
https://www.facebook.com/share/r/1B8eSsUgYU/?mibextid=wwXIfr
#कोजागिरी_पौर्णिमा_व_दम्याचे_औषध
पावसाळा संपताच हिवाळा सुरू होण्यापूर्वी वातावरणामध्ये काही काळ कमालीची उष्णता जाणवू लागते. ज्याला आपण सर्वसाधारणपणे ’सप्टेंबर-ऑक्टोबर हीट’ म्हणुन ओळखतो. तो शरद ऋतु होय. मराठी महिन्यानुसार अर्धा भाद्रपद-अश्विन-अर्धा कार्तिक असा शरद ऋतुचा कालावधी आहे. यातील अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा होय. याला आपण सर्व ’कोजागिरी पौर्णिमा’ म्हणुन साजरी करतो.
शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शितल प्रकाशछायेत गच्चीवर किंवा अंगणात मजेशीर गप्पा करत शिजवलेली खीर वा आटवलेली दुध पिण्याचा आंनद लुटणे हा दरवर्षीचा प्रघात आहे. पण फक्त ही मजेसाठीची रीत नसून यामागे शास्त्रीय कारणे आहेत.
आयुर्वेदामध्ये रक्ताच्या फेसापासून फुफ्फुसाची निर्मिती होते असे वर्णन आहे. यावरूनच रक्तधातुचा व फुफ्फुसाचा ( lungs ) चा फार निकटचा संबंध स्पष्ट होतो. तसेच पित्तदोष हे रक्तधातुच्या आश्रयाने सर्व शरीरात अव्ययाहत वाहत असते. तेव्हा रक्ताचा व पित्ताचा संबंधही इथे दिसून येतो. जेव्हा शरदऋतुतील प्रखर उष्णतेने उष्ण व तिक्ष्ण गुण वाढून पित्त अती प्रमाणात वाढायला लागते तेव्हा रक्तधातुही बिघडायला लागतो. कालांतराने त्याचा परीणाम फुफ्फुसांवरही दिसून येतो व पर्यायाने उष्णतेचे व श्वसनासंबंधी विकार उद्भवू लागतात. फुफ्फुसांची कार्यक्षमता उत्तरोत्तर कमी होऊन दम्या सारख्या आजाराला निर्माण करतात. यालाच आधुनिक शास्त्रामध्ये ब्रॉकिअल अस्थमा असे म्हणतात.
अस्थमा सारख्या आजारांमध्ये फुफ्फुसांमध्ये कफाचा अडथळा कमी करून शक्यतोवर उपचार केले जातात. प्रत्येकच वेळेस दम्याचा त्रास व्हावयास लागला की श्वसनाचा अडथळा तात्पूरता घालवून वर्षानुवर्षे औषध खात असतो. या सगळ्यामध्ये त्याच्या फुफ्फुसाच्या कार्यक्षमता सुधारण्यासाठी कुठल्याही औषधाचा उपयोग केल्या जात नाही. म्हणुन रुग्णाला काही कालांतराने याप्यत्व ( आजार पूर्णत: बरा करण्यास कठीण ) येते.
कोजागिरी पौर्णिमेला चंद्राचे शितलता पूर्णत्वास प्राप्त असते. चंद्राच्या शितल किरणांमध्ये विशिष्ट असे चुंबकीय शक्ती ह्या काळात पृथ्वीवर अधिक मात्रेत वाहत असते, असे संशोधनाअंती आढळून आले आहे. म्हणुनच पूढील पद्धतीने जर कोजागिरी पौर्णिमेला शीजवलेली खीर / दुध पथ्ये पाळून सेवन केली तर पित्ताचे, उष्णतेचे व श्वसनासंबंधीचे सर्व आजारांवर ताबा मिळवता येतो.
काकडशिंगी, पिंपळी, कचूर, भारंगी, बांबूच्या पानांचा रस, वंशलोचन व तुळशीच्या मंजीर्या इ. औषधे दुधामध्ये शरदातील चंद्राच्या शीतल प्रकाशछायेत शिजवावे किंवा एक वाटी तांदूळ, दुध व औषधी एकत्र शीजवून त्याची खीर बनवावी. रुग्णाने ही खीर स्वत:च्या हाताने बनवावी. रात्री १२ नंतर आटवलेले दुध, खीर सेवन करावी. औषधाच्या चार तास आधी व नंतर काहीही खाऊ नये. शक्यतोवर पहाटे चार पर्यंत जागरण करावे. दुसर्या दिवशी सकाळपासून पूर्ण दिवस लंघन ( उपवास ) करावा.
अशा पद्धतीने जर सर्व पथ्ये पालन करून औषधी सेवन केल्यास शरीरामध्ये विरेचन क्रिया आपोआपच घडून येते. त्याद्वारे शरीरातील वाढलेले पित्त, उष्णता जुलाबावाटे शरीराबाहेर पडते. शरीर शुद्ध होते. पर्यायाने उष्णतेचे आजार अंग खाजविणे, केस गळणे, छातीत जळजळ, अम्लपित्त, डोळ्यांची जळजळ, तळपाय व तळहातांची होणारी जळजळ लगेच कमी व्हायला लागते. अर्थातच ह्याच्या जोडीला नियमीत औषधोपचार, पथ्येपालन, ऋतुनुसार पंचकर्मे आणि योग प्राणायामाची साथ मिळाली तर दुग्ध शर्करा योगच !
दुध हे स्वत: विरेचक ( जुलाब करणारे ) औषध आहे. म्हणुन स्वस्थ व्यक्तींनी सुद्धा अश्या पद्धतीने कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीला सर्व पथ्ये पाळून चंद्राच्या शीतलतेने युक्त असे हे दुध सेवन केल्यास स्वास्थ्यलाभ होतो. सोबतच हिवाळ्यात पडणार्या थंडीशी सामना करण्याचे बळ मिळते.
निसर्गातील ऋतुपरत्वे मानवी शरीरावर होणार्या बदलांचा सुक्ष्म विचार आयुर्वेदामध्ये आढळतो. असा सखोल व सुक्ष्म विचार क्वचितच दुसर्या शास्त्रामध्ये दिसून येतो. म्हणुन सणासुदीच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीमध्ये लावून दिलेल्या चालीरितींमध्ये निश्चितच शास्त्रीय कारणे आहेत. म्हणुनच यासाठी आयुर्वेदीय सिद्धांत पडताळून बघण्याची आवश्यकता आहे.
डॉ मिलिंद सज्जनवार
आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ
बि ए एम एस, डि वाय ए (पुणे)
श्री विश्वसाधना आयुर्वेद पंचकर्म योग चिकित्सालय
वर्धा | नागपूर | हिंगणघाट | यवतमाळ
अधिक माहितीसाठी संपर्क : 99755629004